प्रेयसीने हत्येचा कट रचला, पण बायकोच्या सतर्कतेमुळंच वाचला पतीचा जीव

Trending News In Marathi: प्रेमप्रकरणातून एका व्यक्तीचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्याच्याच हत्येचा कट रचला जात होता. मात्र सुदैवाने तो बचावला 

मानसी क्षीरसागर | Updated: Apr 18, 2024, 02:24 PM IST
प्रेयसीने हत्येचा कट रचला, पण बायकोच्या सतर्कतेमुळंच वाचला पतीचा जीव title=
UP woman asks boyfriend to meet at night kidnaps with second lover

Trending News In Marathi: प्रेम पकरणातून होणाऱ्या गुन्ह्यांच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे. विवाहबाह्य संबंधांतून एका व्यक्तीच्या हत्येचा कट रचण्यात आला. मात्र, त्याच्याच पत्नीच्या प्रयत्नांमुळं त्याचा जीव  वाचला आहे. मात्र, या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. उत्तर प्रदेशच्या सोनभद्र जिल्ह्यातील ही घटना आहे. पोलिसांना एक व्यक्ती बेपत्ता असल्याचा फोन आला. त्यानंतर लगेचच सूत्र हातात घेत पोलिसांनी शोध मोहिम राबवत त्या व्यक्तीचा शोध घेतला. या व्यक्तीचे अपरहण करण्यात आले होते. मात्र, जेव्हा अपहरणाचे कारण कळले तेव्हा पोलिसांनाही डोक्यावर हात मारला. 

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कुसुम पांडे नावाच्या महिलेने पोलिसात धाव घेत तिचा पती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. महिलेने तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, पती बृजेश पांडे घरातून तिलकोत्सवासाठी जातोय, असं सांगून बाहेर पडला तो घरी परतलाच नाहीये. पोलिसांनी लगेचच या प्रकरणी तपास सुरू केला. पोलिसांचे पथक स्थापन करुन बृजेश कुमारचा शोध सुरू केला. त्याच्या मोबाइल लोकेशनच्या आधारे एका गावात बृजेश पांडे असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याआधारे पोलिसांनी अॅक्शन घेत बृजेशची सुटका केली आणि दोन युवक आणि एक महिलेला अटक केली. अपहरणाच्या 24 तासांच्या आत पोलिसांनी त्याची सुटका केली. 

पोलिसांनी आरोपींची चौकशी केली असताना धक्कादायक बाब समोर आली आहे. आरोपी महिला आणि बृजेश कुमार पांडे या दोघांमध्ये प्रेमसंबंध होते. दोघंही सतत संपर्कात असायचे. मोबाइलवर रात्रं-दिवस बोलत असायचे. पण त्याचवेळी आरोपी प्रतिभा मिश्रा हिचे राजा या व्यक्तीसोबतही संबंध होते. त्यावेळी राजाला प्रतिभाचे बृजेशसोबत असलेल्या संबंधाबाबत कळले. तेव्हा त्याने तिला त्याच्यासोबत न बोलण्याचे बजावले. 

राजाच्या सांगण्यावरुन आरोपीने त्याच्याशी बोलणे सोडले व त्याच्यासोबत नातेदेखील तोडण्याचे ठरवले. मात्र बृजेशने त्याला नकार दिला आणि तिच्यावर बोलण्यासाठी दबाव टाकत होत. अशातच राजाने बृजेशचे अपहरण करुन त्याच्या हत्येचा कट रचला. त्याने प्रतिभाला त्याला भेटायला बोलवून घ्यायला सांगितले. तो भेटायला आल्यानंतर त्याची हत्या करण्याचा कट आरोपींच्या डोक्यात शिजत होता. 

15 एप्रिल रोजी रात्री 8 वाजण्याच्या सुमारास बृजेश कुमार पांड्ये याला रेल्वे रुळांजवळ आरोपीने भेटायला बोलवले. घरात खोटं सांगून तो प्रतिभाला भेटण्यासाठी आला. रेल्वे रूळांजवळ पोहोचताच आरोपींनी त्याचे अपहरण केले. कोणालाही संशय येऊ नये म्हणून ते त्याच्या पत्नी व मुलांशी त्याला संपर्क करु देत होते. रात्री बृजेश पांड्येची हत्या करण्याचा कट ते रचत होते. मात्र, त्या पूर्वीच पोलिसांनी छापा टाकत त्याची सुटका केली आहे. आरोपींनी अटक केली आहे.